रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमान शिक्षेच्या कालावधीवर आधारित असलेल्या ‘हे मृत्युंजय’ या नाटकाचा प्रयोग मे महिन्यात रत्नागिरीत होणार आहे. नाटकाच्या तिकिटांची विक्री होणार नसून, नाटक पाहिल्यावर प्रेक्षकांनी स्वेच्छामूल्य द्यायचे आहे. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे राज्यभर या नाटकाचे प्रयोग होत असून, आता रत्नागिरीतही त्याचा प्रयोग होणार आहे. सावरकर स्मारकाचे विश्वस्त सुनील वालावलकर यांनी रत्नागिरीत पतित पावन मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
वालावलकर म्हणाले, ‘आतापर्यंत या नाटकाचे ६० प्रयोग झाले आहेत. सावरकरांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. तेथील सेल्युलर जेलमध्ये त्यांनी ती शिक्षा भोगली. प्रचंड हाल त्यांनी सहन केले. ११ वर्षे ते तेथे होते. अनेक क्रांतिवीरांनी हे हाल सोसले आहेत. या सगळ्या घटनांचे दर्शन या नाटकातून घडते. ९० वर्षे झगडल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे, याची जाणीव सगळ्यांना व्हावी, स्वातंत्र्याचे मूल्य कळावे, या हेतूने हे नाटक दाखविले जात आहे. युवा पिढीने हे स्वातंत्र्य जपावे, टिकवावे आणि पुढे न्यावे, अशी इच्छा आहे.’
हे नाटक पाहण्यासाठी तिकिटे विकली जात नाहीत. नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी स्वेच्छामूल्य म्हणून आपल्याला वाटेल तेवढी रक्कम द्यावी, अशी पद्धत राबविली असल्याचे वालावलकर यांनी सांगितले.
रत्नागिरीतील प्रयोग मे महिन्यात होणार हे निश्चित झाले असले, तरी त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही; मात्र तो मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात होणार आहे, असे वालावलकर म्हणाले. लहान मुले, तरुणांसह सर्वांनीच हे नाटक आवर्जून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. वेशभूषेची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले असून, देवदत्त बाजी यांचे पार्श्वसंगीत आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांनी सांभाळली आहे. अजिंक्य ननावरे, संदीप सोमण, जयेंद्र मोरे, सुयश पुरोहित, शार्दूल आपटे, बिपीन सुर्वे, नितीन वाघ, विशाख म्हामणकर, केतन पाडळकर, योगेश दळवी, मधुसूदन सोनावणे आदी कलाकारांनी यात भूमिका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि अनामिका यांनी या नाटकाची निर्मिती केली असून, ‘साईसाक्षी’ने ते प्रकाशित केले आहे.
हेही जरूर वाचा :
सावरकरांची ई-बुक्स मोफत :
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.